‘गोलियोसे भून दूंगा,’ म्हणत १० लाखांच्या खंडणीची मागणी
आधी उकळले ५० हजार : नागपुरी गेट ठाण्यात गुन्हा

अमरावती : स्थानिक सुफिया एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष हाजी इरफान खान वल्द उस्मान खान (४९, रा. जमिल कॉलनी) यांच्याकडून ५० हजार रुपये उकळल्यानंतर आणखी १० लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली. दि. ४ मार्च रोजी दुपारी तो प्रकार घडला. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी दि. ७ मार्च रोजी रात्री आरोपी रम्मू ऊर्फ रहमत खान वल्द बिस्मिल्ला खान (रा. चिलमछावणी, फ्रेजरपुरा) याच्याविरुद्ध खंडणी व धमकीचा गुन्हा दाखल केला.
एफआयआरनुसार, आरोपी याने फिर्यादी हाजी इरफान खान यांना ४ मार्च रोजी दुपारी १.०९ वाजता फोन कॉल केला. तथा ‘साले, तुम सब चोर लोग हो. मै एक संघटना चलाता हू और सब मेरेसे डरते है. तुम्हे गोलीयोसे भून ढुंगा’, अशी थेट धमकी त्याने दिल्याचे हाजी इरफान खान यांनी म्हटले आहे.
यापूर्वी आरोपी रम्मू याने इरफान खान यांच्याकडून ५० हजार रुपये उकळले. हाजी इरफान यांनी अमरावती विधानसभेची निवडणूक लढविली होती. विशेष म्हणजे, रम्मू हा एक सामाजिक संघटनेचा प्रमुख आहे.
५० हजार रुपये घेतले, तरीही १० लाखांची मागणी ५० हजार रुपये घेतल्यानंतरही आरोपीने आपल्याला पुन्हा फोन कॉल केला तथा १० लाख रुपयांची मागणी केली. १० लाख रुपये न दिल्यास शहरात जगणे मुश्कील होईल, कुटुंबातील सर्वांना संपवेन, अशी गंभीर धमकी दिल्याचे हाजी इरफान यांनी तक्रारीत म्हटले आहे. नागपुरी गेटचे ठाणेदार हनमंत उरलागोंडावार यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने गुन्हा नोंदविला.
‘त्या’ प्रकरणाची किनार?शहरातील मुस्लिमबहूल भागालगतच्या क्षेत्रात शासन आणि जनतेची फसवणूक करून शंभर रूपयांच्या मुद्रांकावर परस्पर खरेदी विक्री केली जात आहे. भूमाफियांकडून शासकीय जमिनीवर नियमबाह्य अभिन्यास पाडून ते विकण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या खंडणी प्रकरणाला त्याची किनार असल्याची माहिती आहे. मात्र, त्याला नागपुरी गेट पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिला नाही.