Sauragram Village: नागरवाडी गावाला जिल्ह्यातील पहिले ‘ सौरग्राम’ चा बहुमान

अमरावती : प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत जिल्ह्यातील पहिले “सौरग्राम”होण्याचा बहुमान चांदुरबाजार तालुक्यातील नागरवाडी गावाला मिळाला असून छतावर सौर प्रकल्प बसवून वीज निर्मितीला सुरूवात केल्यामुळे पुढील काळातील गावाचे विजेचे बिल शुन्य होणार असल्याचे प्रतिपादन मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले.
स्वतंत्र गावाचा दर्जा असलेले संत श्री गाडगे महाराज संस्थान व आश्रम शाळा नागरवाडी गावातील सर्व वीज जोडण्या सौर प्रकल्पाला जोडल्यामुळे नागरवाडी हे पहिले सौरग्राम ठरले आहे. यावेळी या संस्थानचे संस्थापक बापूसाहेब देशमुख,अधीक्षक अभियंता दीपक देवहाते,कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट,उपकार्यकारी अभियंता दिनेश भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी आणि बापूसाहेब देशमुख यांच्याहस्ते लोकार्पण
यावेळी मुख्य अभियंता श्री कुलकर्णी म्हणाले की, नागरवाडी गावाने पुढाकार घेत छतावरील सौर प्रकल्पाच्या माध्यमातून वापरासाठी लागणारी वीज स्वत: निर्माण करण्याला सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील इतर गावांनीही नागरवाडी गावाचा आदर्श घेत प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेचा लाभ घेत आपल्या छतावर सौर प्रकल्प बसवून वीजनिर्मिती करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यकारी अभियंता विजय कुमार कासट म्हणाले की , नागरवाडी गाव हे ”सौरग्राम” म्हणून उदयास आलेले वर्धा जिल्यातील चिचघाट नंतर विदर्भातील दुसरे गाव आहे.यासाठी बापूसाहेब यांचा पुढाकार आणि मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगीतले.
जिल्ह्यातील पहिले आणि विदर्भातील दुसरे सौरग्राम
चांदूर बाजार पासून २० किमी अंतरावर असणारे संत श्री गाडगे महाराज संस्थान नागरवाडी या गावाला स्वतंत्र गावाचा दर्जा आहे. आश्रम शाळा,वस्तीगृह आणि एकुण १० शिक्षक सदनिकाचा यात समावेश आहे. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेतील प्रति किलोवॅट ३० हजार रूपये अनुदानाचा लाभ घेत याठिकाणी १० शिक्षक सदनिकेच्या छतावर प्रति १ किलोवॅटचे सौर प्रकल्प बसविण्यात आले.त्याचबरोबर संस्थेसाठी ७.५ किलोवॅटचे स्वतंत्र सौर प्रकल्प (विना अनुदान)बसविण्यात आले आहे.त्यामुळे एकून १७.५ किलोवॅटची सौर यंत्रणा बसविण्यात आल्यामुळे महिन्याला सरासरी २००० हजार युनिटची वीज निर्मिती होणार आहे व वीज देयकात तेवढीच बचत होणार आहे.
मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात तसेच ऊर्जा सचिव आभा शुक्ला आणि महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र,संचालक (संचालन) अरविंद भादीकर, संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे,प्रादेशिक संचालक, नागपूर परेश भागवत, कार्यकारी संचालक (विशेष प्रकल्प) धनंजय औंढेकर यांच्या पुढाकाराने प्रत्येक जिल्ह्यातील किमान दोन गावे ही शंभर टक्के सौरग्राम करण्याचे नियोजन आहे.
नागरवाडीला “सौरग्राम”चा बहुमान मिळवून देण्यासाठी मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी आणि अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट उपकार्यकारी अभियंता दिनेश भागवत,सहाय्यक अभियंते प्रसाद पांडे आणि चंद्रशेखर कुंभारकर यांनी मोलाची भूमिका पार पाडली.